Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest

Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग) Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

12th Marathi Guide Chapter 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग) Textbook Questions and Answers

कृती

1. वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा.
उत्तर :
मानवी जीवन बातम्यांनी वेढलेले आहे. बातमी वाचली वा सांगितली, तरी वाचकांच्या मनातील उत्सुकता संपत नाही. बातमीत वस्तुनिष्ठ माहिती असते. घडलेली घटना जशीच्या तशी सांगितली जाते. परंतु घटनेच्या भोवताली असलेल्या अनेकविध कंगोऱ्यांचा वेध ज्या लेखनातून घेतला जातो, त्याला वृत्तलेख असे संबोधले जाते. बातमीत ज्या बाबी निदर्शनास येत नाहीत, त्या शोधून रंजक, नावीन्यपूर्ण पद्धतीने वृत्तलेखात मांडल्या जातात. वृत्तलेखाला इंग्रजीत फिचर असे म्हणतात. फिचर या शब्दाचा ऑक्सफर्डच्या शब्दकोशातील अर्थ आहे, ‘बातमीपलीकडचे खास असे काही, आकर्षक असे काही.’

म्हणजेच बातमी ज्या घटनेविषयी आहे, त्याचे तपशील वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वृत्तलेख करीत असतात. वाचकांच्या मनात बातमीविषयी उत्कंठा वाढवणे, माहिती देणे, ज्ञान देणे, वृत्तलेखाचे महत्त्वाचे कार्य असते. वृत्तलेखाचा आशय, विषय, मांडणी, शैली वाचकांच्या अभिरुचीला साजेशी असते. वृत्तलेख बातमीचे आस्वादनीय रूप असते.



2. बातमी आणि वृत्तलेख यातील फरक स्पष्ट करा.
उत्तर :
‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’ या उक्तीनुसार मनुष्य जीवन जगत असतो. माहिती मिळवणे आणि ती इतरांना सांगणे मनुष्य स्वभावाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणता येते. बातमी हा आपल्या आयुष्यातला अपरिहार्य घटक बनला आहे. बातमीत घडलेली घटना जशीच्या तशी सांगण्यावर विशेष लक्ष असते. वस्तुनिष्ठता हा बातमीचा विशेष मानला जातो. लोकजागृती, लोकशिक्षण हे बातमीत महत्त्वाचे असते. बातमीत ‘मी’ असत नाहीत. घटनेचे वास्तवदर्शी रूप बातमी दाखवत असते. बातमी एखादया घटना/प्रसंगाचे दर्शनी रूप नजरेसमोर उभे करू शकते.

वृत्तलेख बातमीच्या पलीकडे असणारी बातमी मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. बातमीत न आलेली नावीन्यपूर्ण, रंजक माहिती वृत्तलेखात वाचावयास मिळते. बातमीतील घटनेमागे असणारे सूक्ष्म धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न वृत्तलेखात केला जातो. वृत्तलेख बातमीच्या पायावर उभा असला, तरी वृत्तलेखाचे रूप लालित्यपूर्ण असते. काल्पनिकता नसली तरी बातमीतील अस्पर्शित नोंदी विस्तृतपणे चित्रित केल्या जातात.

3. वृत्तलेखाचे प्रकार लिहून, कोणत्याही एका प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.
उत्तर :
वृत्तलेखाचा विषय, मांडणी यानुसार वृत्तलेखाचे काही प्रकार पाहायला मिळतात. ते असे :
(१) बातमीवर आधारित वृत्तलेख (२) व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख (३) मुलाखतीवर आधारित वृत्तलेख (४) ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख (५) नवल, गूढ, विस्मय यांवर आधारित वृत्तलेख. या सर्व प्रकारांमधील व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. या प्रकारात एखादया विशिष्ट क्षेत्रातील नामवंत, उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तीच्या कार्यप्रवासावर लिहिले जाते. एखादया क्षेत्रात काम करीत असताना त्या व्यक्तीच्या जीवनात आलेले अनुभव, यश, अडचणींचा केलेला सामना, संघर्ष, उपक्रम, विक्रम इत्यादींसंदर्भात विस्ताराने लिहिले जाते.

या प्रकारचे वृत्तलेख औचित्य साधून लिहिले जातात. पुरस्कार, जयंती, पुण्यतिथी, जन्मशताब्दी यांसारख्या प्रसंगी व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख लिहिले जातात. काही वेळा त्या व्यक्तिसंबंधाने झालेले पूर्वीचे लेखन, त्या व्यक्तीने अन्य लोकांबद्दल केलेले लेखन, त्या व्यक्तीसोबत काम केलेल्या अन्य व्यक्तींचे अनुभव, त्या व्यक्तीच्या सहकाऱ्यांकडून मिळवलेली वैशिष्ट्यपूर्ण माहिती इत्यादींचाही वृत्तलेख लिहिताना उपयोग होतो. केवळ आकडेवारी, सनावळ्या यांना या लेखात फारसे महत्त्व नसते. त्या व्यक्तीची जीवनशैली, वेगळेपण, सवयी अशा व्यक्तिगत जीवनाला स्पर्श करणाऱ्या बाबी महत्त्वाच्या ठरतात.

या प्रकारच्या लेखात व्यक्तीच्या जीवनातील भावनिक गोष्टींना अधिक महत्त्व असते.



4. ‘वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी लिहा.
उत्तर :
वृत्तलेख वाचकांच्या जिज्ञासापूर्तीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. बातमीत जे अस्पर्शित आहे, ते शोधून त्याचा सविस्तर आढावा वृत्तलेख घेत असतो. वाचक नेहमीच वर्तमानपत्रीय लेखनात मूलभूत घटक ठरला आहे. वृत्तलेखात वाचकाची अभिरुची प्राधान्याने लक्षात घेतली जाते. वृत्तलेखात तात्कालिकता हा मुद्दाही लक्षात घेतला जातो. वृत्तलेख नैमित्तिक असतो. वृत्तलेखाचे कारण लक्षात घेऊन वाचक वृत्तलेख वाचत असतो. वृत्तलेखाच्या आराखड्यातून वृत्तलेखाचे वेगळेपण अधोरेखित करता येते. यासाठी वृत्तलेखाची मांडणी करताना वेगळेपणाचा विचार करणे गरजेचे असते.

वृत्तलेखाच्या आरंभापासून ते शेवटच्या वाक्यापर्यंत वृत्तलेखाने वाचकाची उत्सुकता टिकवून ठेवणे आवश्यक असते. यासाठी वृत्तलेखाचा विषय, मध्यवर्ती कल्पना, शीर्षक, तक्ते, नकाशा, छायाचित्र या सर्वांचा विचार करावा लागतो. वृत्तलेखाचा मजकूर जेवढा उत्तम हवा असतो, त्यासोबतच समर्पक छायाचित्रांची यथोचित मांडणी महत्त्वाची असते. वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी मांडणीचा वाटा महत्त्वाचा असतो.

वृत्तलेखात शैली या घटकावरही लक्ष दयावे लागते. वृत्तलेखाचा आरंभ, मध्य आणि समारोप यांतून वृत्तलेखनातून अपेक्षित हेतू साध्य होणे आवश्यक असते. वृत्तलेखाच्या भाषेचा विचारही अपेक्षित असतो. सरळ, साधी, मनाला भिडणारी भाषा असणे आवश्यक असते. उत्तम वृत्तलेखासाठी या महत्त्वपूर्ण बाबी विचारात घेणे आवश्यक असते.

5. थोडक्यात उत्तरे लिहा.


प्रश्न अ.
वृत्तलेखाची गरज
उत्तर :
बातमी वाचली तरी वाचकांच्या मनातील बातमीविषयीची उत्सुकता संपत नाही. बातमी घडलेल्या घटनेचे वास्तव चित्रण करीत असते. घटना समजून घ्यायची असेल, तर बातमीत न आलेल्या बाबींचा शोध घेणे आवश्यक असते. वृत्तलेख बातमीच्या आतील बातमी उलगडून दाखवण्याचे काम करीत असते. वृत्तलेखातून बातमीच्या मुळापर्यंत पोहोचणे शक्य होते. घडून गेलेल्या वा घडू पाहणाऱ्या घटनेशी वृत्तलेखाचा संबंध असतो. वृत्तलेख वाचकांना आनंद देणारा, माहिती देणारा असतो. वाचकांच्या विचारांना धक्का देण्याची ताकद वृत्तलेखात असते. बातमीचा आनंद घेण्यासाठी वृत्तलेखाची मदत होत असते. वृत्तलेख वाचकांच्या भावनांची दखल घेत असतो. वाचकांचे समाधानही वृत्तलेख वाचनातून होत असते.




प्रश्न आ.
वृत्तलेखाचे स्रोत
उत्तर :
प्रसारमाध्यमांवर प्रकाशित, प्रसारित होणाऱ्या बातम्या पाहिल्यानंतर लेखकाच्या मनात वृत्तलेखाचे बीज तयार होत असते. बातमीच्या अनुषंगाने असणारे संदर्भ, गोष्टी, मुलाखती या बाबींचा पाठपुरावा केला की वृत्तलेखाला आवश्यक वातावरण निर्माण होत असते. बातमी हा वृत्तलेखाचा महत्त्वाचा स्रोत आहे. बातमीतल्या घटनेचे स्वरूप आणि परिणाम समजून घेण्यासाठी वृत्तलेख दिशादर्शक ठरू शकतो. पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक व्यक्तींशी संपर्क होत असतो. त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून वृत्तलेखाचे विषय मिळू शकतात. पत्रकारितेत नेहमी बातमी सहज उपलब्ध होतेच असे नाही. बऱ्याचदा बातमी शोधावी लागते, त्यातील छुपे कंगोरे शोधावे लागतात. त्यासाठी बातमीशी निगडित अनेक लोकांशी संभाषण करावे लागते. यातून वृत्तलेखाला बीज सहज मिळू शकते. वृत्तलेखासाठी बारकाईने निरीक्षण अपेक्षित असते. सभोवताली घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करता येणे, त्यातील बातमी शोधून वृत्तलेखाचा विषय निर्माण करता येऊ शकतो.


प्रश्न इ.
वृत्तलेखाची भाषा
उत्तर :
वृत्तलेख बातमीवर आधारित असला, तरी बातमीपेक्षा अधिक सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. वृत्तलेख लिहिताना वाचकांच्या अभिरुचीचा विचार वृत्तलेखात प्राधान्याने केला जातो. सर्वसाधारण वाचक वर्ग नजरेसमोर ठेवून वृत्तलेखाच्या विषयांची निवड केली जाते. वृत्तलेखाची भाषा देखील सहज, सोपी चटकन ५ विषय लक्षात येईल अशी असणे अपेक्षित असते. भाषेचे स्वरूप सरळ असले, तरी परिणामकारकता असणे गरजेचे असते. वृत्तलेख वाचकांची उत्सुकता वाढवत असल्याने भाषा मनाला भिडणारी असावी. वृत्तलेखातील मजकुरातील शब्दबंबाळपणा टाळणे आवश्यक असते. लहान लहान वाक्यरचना, बोलीभाषेतील शब्द असतील, तर विषय समजण्यास सोपे होते. विषयाचा हेतू लक्षात घेऊन वाचकांची जिज्ञासा शमली जावी, अशा भाषेत वृत्तलेखाची मांडणी असणे अभिप्रेत असते.


प्रश्न ई.
वृत्तलेखाची वैशिष्ट्ये
उत्तर :
अनेकदा एखादया बातमीच्या वाचनानंतर वाचकाच्या मनात त्या बातमीविषयी कुतूहल निर्माण होते. बातमीच्या स्वरूपानुसार घटनेमागील घटना बातमीत सांगितली जात नाही. अशा वेळी वाचकांच्या उत्सुकतेसाठी वृत्तलेख लिहिले जातात. वृत्तलेख तात्कालिक असतात. घटनेचे निमित्त वृत्तलेखाच्या पाठीशी असते. वृत्तलेख घडून गेलेल्या घटनेबद्दल बोलत असते. बातमीत घटनेचा तपशील देता येत नाही. वृत्तलेखात बातमीतील अदृश्य दुवे प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न केला जातो. वृत्तलेखाचा विषय नेहमी ताजा असतो. वृत्तलेखाला ‘धावपळीतले साहित्य’ असेही म्हणतात. वाचकांना बातमीचा आस्वाद घेण्यासाठी वृत्तलेखाची निर्मिती होत असते.




6. वर्तमानपत्रातील एखादा वृत्तलेख मिळवा आणि त्यात आढळलेली वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
दि. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी लोकसत्ता या वर्तमानपत्रातील चतुरंग पुरवणीत प्रकाशित झालेला वृत्तलेख वाचला. मीना वैशंपायन यांनी लेखिका दुर्गा भागवत यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सदर वृत्तलेख लिहिला आहे. दहा फेब्रुवारी हा दुर्गाबाई भागवतांचा जन्मदिवस. या निमित्ताने ‘मुक्ता’ या शीर्षकाने हा वृत्तलेख लिहिला आहे. दुर्गाबाई भागवतांची वैचारिक भूमिका, स्त्री सक्षमीकरणाचे विचार आणि दुर्गाबाई भागवत यांच्यातील स्त्री जाणिवांचा वेध घेणे हा वृत्तलेखाचा मध्यवर्ती विषय आहे. वृत्तलेखाचा आरंभ १९७५ च्या काळातील आणीबाणीचा संदर्भ आणि दुर्गाबाई भागवतांची परखड भूमिका या संदर्भांनी केला आहे.

१९७५ ची आणीबाणी, त्याच वर्षी दुर्गाबाई भागवत यांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि १९७५ ला घोषित झालेले जागतिक महिला वर्ष यांचे संदर्भ वृत्तलेखाच्या पहिल्या टप्प्यात लेखिकेने नमूद केले आहेत. हे वाचत असताना वाचक म्हणून उत्सुकता हळूहळू वाढत जाते. स्त्रीस्वातंत्र्य, सबलीकरण, स्त्री-पुरुष समानता याबद्दल दुर्गाबाई भागवतांच्या विचारांचे विश्लेषण लेखिकेने विस्तृतपणे केले आहे. स्त्री मूलतः सक्षम आहे हे सांगताना दुर्गाबाई भागवत यांनी लिहिलेल्या ‘विदयेच्या वाटेवर’ या लेखाचा संदर्भ वृत्तलेखिकेने वृत्तलेखात सोदाहरण सांगितला आहे.

सदर लेखाचा व्यक्तिचित्रणात्मक या वृत्तलेख प्रकारात समावेश करता येतो. दुर्गाबाई भागवत यांच्यातील ‘मुक्त स्त्रीत्वाचा दृश्य आविष्कार’ संपूर्ण वृत्तलेखात लेखिकेने समर्थपणे शब्दरूपात उभा केला आहे. वृत्तलेखाचा आरंभ, मध्य आणि समारोप या तीन पातळ्यांवर वृत्तलेख यशस्वी होतो. वृत्तलेखाची भाषा प्रवाही आणि परिणामकारक आहे. दुर्गाबाई भागवतांचे संयत व्यक्तिमत्त्व वाचकांसमोर उलगडून दाखवण्यासाठी तेवढ्याच संयतपणे भाषेचा अवलंब केला आहे.

7. बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना करावयाची तयारी तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
वृत्तलेखाची प्रकृती बातमीवर आधारलेली असते. बातमी वस्तुनिष्ठपणे घटना सांगते. परंतु घटनेपलीकडचे दृश्य वृत्तलेखात चित्रित करायचे कौशल्यपूर्ण काम वृत्तलेखकाचे असते. एखादया घटनेत वेगळेपण असले तरच बातमी बनत असते. अशा बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना सर्वप्रथम बातमीचा विषय समजून घेणे अपेक्षित असते. बातमीतली घटना, तिचे अदृश्य दवे शोधण्यासाठी बातमीतील घटनेचा सूक्ष्मपातळीवर विचार करावा लागेल.



घटनेमागचे कारण आणि परिणाम यांची यथोचित सांगड घालून तटस्थपणे घटनेचा वेध घ्यावा लागेल. बातमीत छुप्या असणाऱ्या घटकांचा शोध घेऊन त्यावर प्रकाश टाकणे, पूरक मुद्दे अधोरेखित करणे अशा बाबींवर प्राधान्याने काम करावे लागेल. बातमीतील मुद्दयांचे सुस्पष्ट भाषेत विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याने बातमीच्या परिघात येणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भात तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे उचित ठरेल. बातमीतील तळ गाठून माहिती कागदावर आणली तर वाचकांची उत्सुकता शमवता येईल.

वृत्तलेख (फिचर रायटिंग) प्रस्तावना

‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’ या उक्तीनुसार माणूस जीवन जगत असतो. माहिती मिळवणे आणि ती इतरांना सांगणे हे मानवी स्वभावाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येते. जे ‘सांगणे’ केवळ स्व-रक्षणासाठी होते, त्याचा प्रवास हळूहळू व्यक्त होण्यापर्यंत येऊन पोहोचला. अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम म्हणून वृत्तपत्रांचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला. मानवी जीवन बातम्यांनी व्यापले गेले. वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन यांसारख्या प्रसारमाध्यमांसोबत नव्याने स्थिर झालेल्या समाजमाध्यमांत आपण बातम्या ऐकत आणि पाहत असतो.

बातमी औत्सुक्य निर्माण करते. बातमी वाचली तरी वाचकांच्या मनात बातमीतल्या घटनेबद्दल अधिकाधिक जिज्ञासा निर्माण होत असते. बातमीत वस्तुनिष्ठता महत्त्वाची असल्याने जे घडले तसेच बातमीत सांगितले जाते. बातमीत न सांगितली गेलेली नावीन्यपूर्ण, रंजक माहिती आणि सूक्ष्म धागेदोरे वाचण्यासाठी वाचकांना वृत्तलेखाचा (फिचर रायटिंगचा) उपयोग होतो.

वृत्तलेख (फिचर रायटिंग) वृत्तपत्र अर्थ आणि स्वरूप :

वर्तमानपत्रांचा जन्म पाश्चात्त्य देशात झाल्याने तेथील काही संकल्पना भारतात देखील रुजल्या. त्यापैकी एक म्हणजे फिचर, म्हणजेच वृत्तलेख. ऑक्सफर्डच्या शब्दकोशात ‘फिचर’चा अर्थ ‘It is a non news article in a news paper’ असा देण्यात आला आहे. म्हणजे ‘बातमीपलीकडचे खास असे काही, आकर्षक असे काही.’
वृत्तलेखांचे प्रकार :

बातम्यांचा विषय आणि लेखनप्रकारानुसार वृत्तपत्र लेखनाचे पुढील प्रकार –

1. बातमीवर आधारित वृत्तलेख :

2. व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख :

3. मुलाखतीवर आधारित वृत्तलेख :

4. ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख :

5. नवल, गूढ इत्यादींवर आधारित वृत्तलेख :

वृत्तलेखाच्या विषयांचे स्रोत :

प्रसारमाध्यमातील व्यक्तींना सध्या घटनेतही बातमी दिसत असते. वर्तमानपत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना येणारे अनुभव, प्रवास, भेटणाऱ्या व्यक्ती विविध वर्तमानपत्रातील बातम्या, पुस्तके, नियतकालिके, संकेतस्थळ यांसारख्या विविध साधनांच्या आधारे वृत्तलेखाचे विविध विषय मिळत असतात. वृत्तलेखाच्या विषयांचे काही महत्त्वाचे स्रोत पुढीलप्रमाणे –

1 बातमी :

2. व्यक्तिगत अनुभव :

3. भेटीगाठी/संभाषण :

4 निरीक्षण :

वृत्तलेखासाठी निरीक्षण आणि पडदयामागे घडणाऱ्या घडामोडींचा वेध घेणे महत्त्वाचे असते. तर्कबुद्धी या लेखनात गरजेची असते.

वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यायच्या बाबी :

वर्तमानपत्रे सतत वाचकांची गरज शोधत असतात. वाचकांची बौद्धिक भूक कशी भागवली जाईल, याचा विचार वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनाला करावा लागतो. वाचकांच्या संख्येवर वर्तमानपत्रांच्या विक्रीची आर्थिक गणिते अवलंबून असतात. त्यादृष्टीने वृत्तलेखासाठी देखील वाचकांची गरज आणि विषयांची निवड यांचा विचार करावा लागतो.

वृत्तलेखात पुढील बाबी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात –



(१) वाचकांची अभिरुची : वर्तमानपत्राला बातमीसोबत वाचक वर्ग कोणता आहे, याचा विचारही प्राधान्याने करावा लागतो. वाचकांची अभिरुची वर्तमानपत्रीय गणितात महत्त्वाची मानली जाते. वाचकांची गरज आणि आवड बघून वृत्तलेखाच्या विषय, आशय, भाषा यांची निवड करावी लागते. वाचकांना आवडतील, उत्सुकता निर्माण करतील, अशा वृत्तलेखांची मांडणी केली तर लोकांच्या पसंतीस पडू शकतात. वाचकांच्या अभिरुचीचा विचार करून लिहिलेले वृत्तलेख वाचकांच्या मनावर अधिराज्य करू शकतात. वृत्तलेखात वाचकांच्या अभिरुचीचा विचार प्राधान्याने करणे आवश्यक असते.

(२) तात्कालिकता : वृत्तलेख नैमित्तिक असतात. वृत्तलेखाचे नियोजन करताना तात्कालिकतेचा विचार करावा लागतो. तात्कालिक कारण असेल तर वाचक तो लेख वाचतात. त्यासाठी त्याचे ताजेपण, समयोचितता साधली जाणे महत्त्वाचे असते.

(३) वेगळेपण : वाचकांची उत्सुकता, जिज्ञासा, समजून घेऊन वृत्तलेखाचे वेगळेपण जपणे महत्त्वाचे असते. वृत्तलेखाच्या आराखड्याचा विचार करताना त्यामधील वेगळेपण लक्षात येण्याची गरज असते.



(४) वाचकांचे लक्ष वेधणे : वृत्तलेखात विषयाच्या आरंभापासून ते शेवटपर्यंत वाचकांची उत्सुकता टिकली पाहिजे. वृत्तलेखाचा आराखडा ठरवणे आवश्यक असते. वृत्तलेखाचा विषय, संदर्भ, शीर्षक, उपशीर्षके, चित्रे, तक्ता, नकाशा, छायाचित्र इत्यादी बाबींचा विचारही वृत्तलेखाच्या मांडणीत करणे गरजेचे असते. मजकुराला समर्पक चित्र/छायाचित्र कुठे उपलब्ध होईल, तसेच त्याचा नेमकेपणाने उपयोग मजकुराच्या कोणत्या भागात करता येईल, याचा विचार करावा लागतो. वृत्तलेखाच्या उत्तम मांडणीसाठी या सर्व बाबींचा सविस्तर विचार लेखकाला करावा लागतो. यासंबंधीचे नियोजन केले, टिपण काढले, चित्रांची मांडणी ठरवली, तर वृत्तलेख लिहिणे सोपे होते.

(५) वृत्तलेखाची शैली : वृत्तलेखात बातमीच्या पलीकडे असणारे कंगोरे शोधावे लागतात. साधारणपणे वृत्तलेखाच्या मांडणीत तीन टप्पे मानले जातात. पहिल्या टप्प्यात वृत्तलेखातील बातमीचा उलगडा केला जातो. बातमीतील ‘का’ या संदर्भातील वाचकांच्या जिज्ञासेची पूर्ती वृत्तलेखाच्या आरंभीच्या भागात होणे आवश्यक असते. वृत्तलेखाच्या मध्य भागात बातमीचे विवेचन अपेक्षित असते. वृत्तलेखाच्या समारोपात वृत्तलेखातून काय अपेक्षित आहे, काय बदल घडावा असे वाटते, याचा विचार मांडणे गरजेचे असते.

वृत्तलेख सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरणे आवश्यक असेल, तर त्याची साधी, सोपी सहज आकलन करता येण्याजोगी असावी. बोजड शब्द, गुंतागुंतीची वाक्यरचना, शब्दबंबाळपणा वृत्तलेखात टाळावा. वृत्तलेखातील वाक्यरचना लहान वाक्यांची असल्यास वाचकांना विषय समजून घेणे सुलभ होते. मनावर पकड घेण्यास परिणामकारक भाषा असावी. ज्या विषयासंबंधी वृत्तलेखाचे औचित्य आहे, तो विषय लोकांच्या जिज्ञासेची पूर्तता करण्यात सफल झाला आहे, याचा विचार करणे आवश्यक असते.

वृत्तलेखातील व्यावसायिक संधी :

नोंद : वृत्तलेख समजून घेण्यासाठी पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.११० व १११ वर दिलेला वृत्तलेख नमुना अभ्यासा.