Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 11 जीवन गाणे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 11 जीवन गाणे Textbook Questions and Answers

1. आकृत्या पूर्ण करा.

2. कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.


उत्तरः

कवीला जगणे शिकवणारे घटक या घटकांपासून कवी काय शिकल
(अ) चंद्र, चांदणे (अ) जगणे
(आ) पणती (आ) जळणे
(इ) नदी (इ) जगणे
(ई) पक्षी (ई) सोसणे
(उ) सागर, वृक्ष (उ) अथांगता, स्थितप्रज्ञता

3. स्वमत

प्रश्न अ.
‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’ हा विचार स्पष्ट करा.
उत्तरः
निसर्ग ही एक मोठी शाळा आहे. त्याला भिंती नाहीत. बसायला बाक नाही की शाळेची घंटा ही येथे नाही. शिक्षक म्हणजे निसर्ग व निसर्गातील प्रत्येक घटक. तेच माणसाला अनेक गोष्टी शिकवून जातात. निसर्गातील लहानशा अशा मुंगीकडून एकाच रांगेने शिस्तीने जाण्याचे धडे घेता येतात. मधमाशीकडून सतत कार्यशील राहण्याचा धडा गिरवता येतो.

झाडाकडून स्थितप्रज्ञता शिकता येते. कोणत्याही कठीण काळात नेटाने उभे राहणारे झाड आपले ‘गुरु’ होतात. नदीकडून अव्याहतपणे काम करण्याची प्रेरणा मिळते. नदी कधी थांबत नाही. प्रवाहशील असते. फुलांकडून सुगंध देणे म्हणजेच इतरांना सुखी कसे करावे, हे शिकता येते. पाण्याकडून निर्मळता शिकता येते. खरोखरच निसर्ग आपला गुरु आहे आणि असे हे बिनभिंतीच्या शाळेतले गुरु आपल्याला खूप गोष्टी शिकवतात.

प्रश्न आ.
‘दुसऱ्यासाठी घाव सोसणे’ या ओळीतील तुम्हांला कळलेला अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
घाव सोसणे म्हणजे अतिशय वेदना सहन करणे. वृक्ष याचे उत्तम उदाहरण आहे. वृक्ष थंडी, ऊन, वारा, पाऊस यांच्याशी सामना करून प्रतिकूल परिस्थितीतही नेटाने उभे असतात. वाटसरूंना सावली देतात. स्वत: मात्र उन्हात तापत असतात. कोणी झाडावर दगड मारले, फांदया छाटल्या, घाव घातले तरी मुकाट्याने सहन करतात व आपली रसाळ फळेही देतात. माणसाने झाडाच्या लाकडाचा बांधकाम, फर्निचरसाठी उपयोग करून घेताना त्याच्यावर निर्दयीपणे करवत चालविली तरी ते झाड दुसऱ्यासाठी घाव सोसते, त्याला मदतच करते. स्वतः त्रास सहन करून दुसऱ्याला मदत करणारे झाड खऱ्या अर्थाने ऋषीमुनींसारखे स्थितप्रज्ञ आहे.

चर्चा करूया.

प्रश्न 1.
निसर्गातील कोणत्याही पाच गोष्टींपासून तुम्हांला काय काय शिकता येईल, याविषयी मित्रांशी चर्चा करा व वर्गात सांगा.

Class 8 Marathi Chapter 11 जीवन गाणे Additional Important Questions and Answers

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

चौकट पूर्ण करा.

प्रश्न 1.
भरकटलेल्या जगात याची जाण नाही – [ ]
उत्तरः
संस्कारांची

प्रश्न 2.
पणत्या येथे आहेत – [ ]
उत्तरः
तुळशीवर

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
स्वैर होऊन नदी का पळते?
उत्तरः
सागराला भेटण्यासाठी स्वैर होऊन नदी पळते.

प्रश्न 2.
भरकटलेल्या जगात कुणाला कशाची जाण नाही?
उत्तरः
भरकटलेल्या जगात संस्कारांची कुणाला जाण नाही.

प्रश्न 3.
दुसऱ्यांसाठी घाव कोण सोसतात?
उत्तरः
वृक्ष दुसऱ्यांसाठी घाव सोसतात.

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

प्रश्न 2.
कोणापासून काय शिकावे – चौकट पूर्ण करा.
उत्तरः
मंजुळ गाणे – [जगणे]

प्रश्न 3.
रिकामी जागा भरून खालील काव्यपंक्ती पूर्ण करा.

उत्तरः

कृती 3: काव्यसौंदर्य.

खालील काव्यपंक्तींचा आशय स्पष्ट करा.

प्रश्न 1.
‘भरकटलेल्या जगात नाही, संस्कारांची जाण कुणाला’
उत्तरः
उपरोक्त पंक्ती ‘जीवन गाणे’ या कवितेतून घेतली असून कवी ‘नितीन देशमुख’ निसर्गातील प्रत्येक घटक आपणांस काही मूल्ये व संस्कार शिकवित असतात हे सोदाहरण पटवून देत आहेत. आजच्या धावपळीच्या युगात संस्कारांची वानवा आहे. प्रसिद्धी आणि पैसा मुख्य ध्येय मानून मूल्ये गुंडाळून ठेवली जात आहेत.

जग भरकटलेले आहे. चांगल्या गोष्टींची घसरण होत चालली आहे. पण याही काळात तुळशीपुढे तेवत असलेल्या पणतीने मला शिकवले, तू असाच जळत रहा. प्रकाश देत रहा. अंधार, अज्ञान दूर सारत रहा. आजुबाजूला असलेल्या अनेक घटकांमधून बोध घेण्यासारखा आहे. मातीच्या पणतीने मला जळत रहायला, पेटत रहायला शिकवले. पणतीचे रुपक प्रस्तुत कवितेत वापरले असल्याने आशयसौंदर्य निर्माण झाले आहे.

प्रश्न 2.
‘बुलंद तरीही असे हौसले, पिल्लासाठी किती सोसले’
उत्तरः
‘जीवन गाणे’ कवितेत ‘नितीन देशमुख’ यांनी जगण्याची कलाच शिकविली आहे. पक्षी झाडावर आपले घरटे बांधतो. एक एक काडी गोळा करून अत्यंत मेहनतीने छोटेसे घरटे साकारतो. त्यात तो आपला संसार उभारतो. पिल्लांना जन्म देतो. त्यांच्या दाणापाण्यासाठी तो दूर दूर भटकतो. दाणे गोळा करून इवल्याशा चोचीने पिल्लांना भरवतो. थंडी, ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करतो. छोट्याशा पंखात बळ आणून उंच उंच उडतो. पिल्लांना मोठे करण्याचा निर्धार करून आकाशात झेप घेतो. त्यांच्याकरिता अपार झटतो. कष्ट सोसतो. या उदाहरणातून कष्टाला पर्याय नाही याची जाणीव होऊन ध्येय निश्चित करून, भक्कमपणे संकटांशी सामना करण्यास कवी शिकतो. या कवितेमध्ये हौसले-सोसले, चोचीमधले-गेले यांचे यमक साधले आहे.

प्रश्न 3.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
उत्तरः
1. कवी / कवयित्री – नितीन देशमुख
2. कवितेचा रचना प्रकार – निसर्ग कविता.
3. कवितेचा काव्यसंग्रह – किशोर मासिक, सप्टेंबर 1009
4. कवितेचा विषय – निसर्ग आपला गुरु असतो. त्याच्यापासून काही ना काही शिकता येते.
5. कवितेतून व्यक्त होणरा भाव (स्थायी भाव) – ही प्रेरणागीत, प्रेरणादायी कविता असून निसर्गाद्वारे जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.
6. कवी/कवयित्रीची लेखन वैशिष्ट्ये – मार्मिक शब्दांचा उपयोग कवीने केला आहे. उदा. सोसले गेले

7. मध्यवर्ती कल्पना – निसर्ग आपणास अनेक गोष्टी फक्त नकळत शिकवित असते. तंत्रयुगातील जग आनंदापासून वंचित होत आहे. निसर्गाशी नाते जोडून निसर्गाकडून बन्याच गोष्टी शिकता येतील व जगण्याची प्रेरणा मिळेल.

8. कवितेतून व्यक्त होणार विचार – निसर्गातील सृष्टीचे मंजुळ गाणे कवीला शीतलता शिकवते. पणतीचे जळणे संस्कारांची जाण देते. नदी, पक्षी, सागर या गोष्टींकडून स्वैरता, आनंद, कष्ट, परिश्रम, गंभीरता इत्यादी गुणांचे दर्शन होते. जीवन जगण्यासाठी हे प्रेरणादायी ठरतात.

9. कवितेतील आवडलेली ओळ – सागराची अथांगता अन् वृक्षाची स्थितप्रज्ञता दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले.

10. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे – मला ही कविता आवडली; कारण या कवितेतून मला निसर्गाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन मिळाला. निसर्गातून आपण अनेक गोष्टी शिकून आपले जीवन आनंददायी बनवू शकतो हा विश्वास निर्माण झाला.

11. कवितेतून मिळणारा संदेश – निसर्ग आपला गुरु असतो. निसर्गातील प्रत्येक घटकापासून आपण काही ना काही शिकत असतो. निसर्गाशी गाते जोडावे, त्याच्याकडून शिकावे व आपले जीवन समृद्ध करावे. तंत्रयुगात यंत्रजालातून आनंद देण्यासाठी निसर्गच आपणास सहाय्य करतो. निसर्गामुळे जगण्याची उमेद येते व ताण हलका होतो.

पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
‘या सृष्टीचे मंजुळ गाणे, जगणे मजला शिकवून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदणे, जगणे मजला शिकवून गेले!
उत्तरः
नितीन देशमुख यांनी ‘जीवन गाणे’ कवितेत निसर्ग आपणास अनेक गोष्टी कळत नकळत शिकवून जातो असे सोदाहरण स्पष्ट केले आहे. सृष्टीतील मंजुळ गाण्याने मला जगण्याची प्रेरणा मिळते. झिलमिलणारे चंद्र व चांदणे मला प्रसन्न करतात. उत्साह निर्माण करतात. जगण्याची उमेद देताना कसे जगावे याचे भान देतात. चंद्र चांदण्यांची शीतलता मन शांत ठेवून कसे जगावे याचे धडे देते. गाणे-चांदणे याचे यमक साधले आहे. ‘झिलमिलणारे चंद्र चांदणे’ यात अनुप्रास साधल्याने काव्यसौंदर्य वाढले आहे.

प्रश्न 2.
भरकटलेल्या जगात नाही, संस्कारांची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्या पणतीचे, जळणे मजला शिकवून गेले!
उत्तरः
तंत्रयुगात जग ‘आनंदा’पासून भरकटत चालले आहे. स्वैराचाराने मूल्ये हरवताना दिसत आहेत. संस्कार लोपले आहेत. स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी पणती कवीपुढे आदर्श आहे. सायंकाळी तुळशीपुढे तेवणारी पणती, तेवत राहून अंधाराचा नाश करते. प्रकाश देते. माणसानेही दुसऱ्यांना प्रकाश देण्यासाठी, मदत करण्यासाठी असेच कष्टाने तेवत राहिले पाहिजे. पणतीचे रुपक, भरकटलेले जग या संकल्पनांनी कवितेचे आशयसौंदर्य खुलले आहे. तुळशीची पवित्रता अर्थसौंदर्य निर्माण करते.

प्रश्न 3.
प्रेम काय ते कुणा न ठावे, नदी सागरा जीव का लावे? स्वैर होऊनी नदीचे पळणे, जगणे मजला शिकवून गेले!
उत्तरः
धावपळीच्या सदय युगात जो तो आपापल्या व्यापात गुंतला आहे. स्वार्थी झाला आहे. प्रेम करणे, समर्पण करणे, त्याग वगैरे तो विसरून गेला आहे. प्रेम म्हणजे जणू त्याला माहितच नाही, अशी स्थिती झाली आहे. पण निसर्ग प्रेम करायला शिकवतो. त्याग शिकवतो. समर्पणाची भावना शिकवतो. नदी सागराला जीव लावते. त्याच्या भेटीसाठी उत्सुकतेने स्वैर होऊन पळते, धावते व सागरात स्वत:ला समर्पण करते. स्वत:च सागर होऊन जाते. असे निखळ प्रेम नदीवाचून कुठे मिळेल?

नदी व सागराचे उत्तम उदाहरण त्याग, प्रेम व समर्पण ही मूल्ये शिकविते. मूल्यसहित जगणेच ‘जगणे’ असते हा अर्थ स्पष्ट करून कवितेस अर्थसौंदर्य प्राप्त करून दिले आहे. ठावे-लावे या शब्दांचे यमक आहे.

प्रश्न 4.
बुलंद तरीही असे हौसले, पिल्लासाठी किती सोसले, चिवचिवणाऱ्या चोचीमधले, दाणे मजला शिकवून गेले!
उत्तरः
ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणे गरजेचे असते, हे पक्षी व पिल्लू या उदाहरणाद्वारे दर्शविले आहे. एवढासा लहान पक्षी काडीकाडी जमवून घरटे बांधतो. पिल्ले जन्मास घालतो. त्याला दाणा-पाणी देण्यासाठी उंच उंच भराऱ्या घेतो. त्याच्या चोचीत दाणे घालतो. पिल्लाच्या पंखात बळ येईपर्यंत त्याच्यासाठी कष्ट सोसतो. निसर्गातील या उदाहरणाद्वारे परिश्रम करणे, कष्ट सोसणे याचा अर्थ कवीला उलगडतो व जीवन जगण्याची कला शिकवितो. हौसले-सोसले, मधले-गेले या शब्दांचे यमक असून ‘ध्येयपूर्तीसाठी झटणे’ या प्रेरणेने कवितेस आशयसौंदर्य प्राप्त झाले आहे.

प्रश्न 5.
सागराची अथांगता अन् ही, वृक्षाची स्थितप्रज्ञता, दुसऱ्यासाठी घाव सोसणे, जगणे मजला शिकवून गेले!
उत्तरः
सागर व वृक्ष हे निसर्गाचे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. माणसाने उथळ विचार न करता समुद्राची गंभीरता व अथांगता आत्मसात केली पाहिजे. सागर सर्वसमावेशक आहे. तरीही खोल व शांत आहे. वृक्ष कोणत्याही हवामानात अचल, स्थिर उभे असतात. संकटांशी सामना करतात. प्रसंगी त्यांच्यावर घाव पडले तरी सहन करून मानवाला लाकूड, फळे, फुले, औषधे देतात. सावली देतात. मदतीचा हात देतात. दुसऱ्यासाठी घाव सोसूनही परोपकार करणारे वृक्ष खऱ्या अर्थी स्थितप्रज्ञ असतात. सागर व वृक्षाचे समर्पक उदाहरण देऊन कवितेस अर्थसौंदर्य प्राप्त झाले आहे. अथांगता, स्थितप्रज्ञता ही मूल्ये उद्धृत केली आहेत.

व्याकरण व भाषाभ्यास

प्रश्न 1.
कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.
उत्र:
गाणे – चांदणे, ठावे – लावे, सोसले – गेले, सागराची – वृक्षाची

प्रश्न 2.
पुढील शब्दांचे समान अर्थ असलेले शब्द कवितेतून शोधून लिहा.

उत्तरः

काव्यपरिचय:

निसर्ग आपला गुरू असतो. निसर्गातील प्रत्येक गोष्टीपासून काही ना काही शिकता येते. या कवितेत कवी नितीन देशमुख यांनी अनेक उदाहरणांद्वारे हे पटवून दिले आहे.

Nature is our guide. We can learn so many things from nature. The Poet Nitin Deshmukh has explained this by giving many examples in this poem.

भावार्थ:

या सृष्टीचे मंजुळ गाणे, जगणे मजला शिकवून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदणे, जगणे मजला शिकवून गेले!

सृष्टीचा एक असीम आनंद असतो. सृष्टीचे मंजुळ गाणे कवीला जगण्याची प्रेरणा देते. आकाशातील झगमगणारे चंद्र तारे कवीला कसे जगावे ते शिकवून गेले. गाण्याची मधुरता, चांदण्यांची शीतलता जीवनात उतरावी असा कवीचा भाव आहे.

भरकटलेल्या जगात नाही, संस्कारांची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्या पणतीचे, जळणे मजला शिकवून गेले!

आजच्या तंत्रयुगात मूल्य व संस्कारांचा बहुतेकांना विसर पडला आहे. भरकटलेल्या जगात संस्कारक्षम जगणे फारच कमी जणांना ठाऊक आहे. संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी तुळशीपुढे पणती लावली जाते. त्या पणतीनेही कवीला जळणे अर्थात अव्याहत कष्ट करणे शिकवले आहे.

प्रेम काय ते कुणा न ठावे, नदी सागरा जीव का लावे? स्वैर होऊनी नदीचे पळणे, जगणे मजला शिकवून गेले!

धावपळीच्या युगात कोणालाही कोणासाठी वेळ नाही. प्रेम काय असते कुणास ठाऊक नाही. ही हरवलेली प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी कवीने नदी व सागराचे समर्पक उदाहरण दिले आहे. नदी सागराच्या प्रेमाच्या ओढीने स्वैरपणे वाहत सागरास जाऊन भेटते व त्यातच एकरूप होते. प्रेमासाठी जगण्याचा आदर्श कवी नदीकडून घेतो.

बुलंद तरीही असे हौसले, पिल्लासाठी किती सोसले, चिवचिवणाऱ्या चोचीमधले, दाणे मजला शिकवून गेले!

पक्षी आपल्या पिल्लांसाठी अपार कष्ट करतात. हौसले भक्कम ठेवतात. नेटाने कष्ट करून घरटे बांधतात. उंच उंच आकाशात चिमुकल्या पंखांनी झेप घेतात. चोचीत पिलांसाठी दाणे घेऊन येऊन त्यांना भरवतात. त्यांच्या पंखात बळ येईपर्यंत कष्टाने त्यांना वाढवतात. चोचीतील दाणे सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते. चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. कष्टाचे, निर्धाराचे धडे कवीला पक्ष्यांकडून मिळतात.

सागराची अथांगता अन्, ही वृक्षाची स्थितप्रज्ञता, दुसऱ्यासाठी घाव सोसणे, जगणे मजला शिकवून गेले!

निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्ये व संस्कार शिकवत असतात. सागर अथांग पसरला आहे. त्याचा विस्तार खूप मोठा आहे. त्याची गंभीरता, खोली माणसाने शिकण्यासारखी आहे. वृक्ष स्वत:वरचे कु-हाडीचे घाव सहन करतो पण दुसऱ्याला लाकूड, फळे, फुले, सावली देतो. दुसऱ्यासाठी घाव सोसून परोपकार करणाऱ्या वृक्षांचा माणसाने आदर्श ठेवावा. जगायचे कसे हे समुद्र व वृक्ष शिकवतात.

शब्दार्थ:

वाक्प्रचार: